उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत; जुन्नर तालुक्यातील शेतकरी व विक्रेत्यांनी मांडली व्यथा.
खतांच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकरी त्रस्त
गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. यावर्षीही मोठी भाववाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आगामी हंगामात पीक नियोजन करताना शेतकऱ्यांना खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे आणि त्यांचे आर्थिक गणित जुळत नसल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत. अलीकडच्या काळात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते हा महत्त्वाचा भाग बनला आहे, ही गरज लक्षात घेता शासनाकडून रासायनिक खतांचे भाव गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
गोणीमागे २०० ते २५० रुपयांची वाढ
एकीकडे शेतीमालाला उत्पादन खर्चाप्रमाणे योग्य भाव मिळत नसताना खते व कीटकनाशकांच्या किमती दरवर्षी वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सुरू होत असलेल्या हंगामापूर्वीच खतांच्या किमती गोणीमागे २०० ते २५० रुपयांनी वाढल्या आहेत. खताच्या जुन्या व नवीन दरांमध्ये मोठी तफावत असून, शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. उन्हाळी कांदा आणि इतर पिकासाठी लागणारा रासायनिक खतांचा डोस आवश्यक असल्यामुळे शेतकरी खत खरेदी करण्यासाठी दुकानात जात आहेत, तेव्हा खतांच्या किमती वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत. सध्या कांद्यासाठी एकरी चार बॅग रासायनिक खत लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडणार आहे.

















