नगरपरिषद निवडणुकीमुळे थांबलेले अनुदानाचे काम पूर्ववत होणार; अतिवृष्टी, रब्बी अनुदान आणि केवायसी मिसमॅचचे अडथळे दूर होणार.
निवडणुकीमुळे थांबले होते वाटप
दिवाळीच्या काळात सरकारने अनुदान जाहीर करून दिवाळी गोड करण्याची घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात केवळ २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांच्याच खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा झाले. उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान मात्र संथगतीने वितरित झाले किंवा पूर्णपणे थांबले. काही शेतकऱ्यांचा एक हप्ता आला, तर काहींना एक रुपयाही मिळाला नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू होत्या, ज्यामुळे तलाठी, कृषी सहाय्यक आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते. परिणामी, अनुदान वाटपाचे सर्व काम जवळजवळ थांबले होते.
५ डिसेंबरनंतर प्रक्रिया होणार सुरू
आता ४ डिसेंबरला निवडणुका संपणार असून, ५ डिसेंबरपासून निकालानंतर सर्व कर्मचारी पुन्हा आपापल्या अनुदान वाटपाच्या कामाला लागणार आहेत. एकदा कर्मचारी परतले की अनुदान वाटपाची प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू होईल. सरकारी तिजोरीतील बजेटचा कोणताही प्रश्न नाही, कारण फाईल्स आणि याद्या तयार आहेत; फक्त कर्मचाऱ्यांच्या परत येण्याची प्रतीक्षा आहे. कर्मचारी कामावर रुजू होताच थांबलेले सर्व व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत.
















