सार्वजनिक वितरण प्रणालीत तंत्रज्ञानाचा वापर; गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘एसएमएस अलर्ट’ सेवा सुरू, ‘मेरा रेशन’ ॲपही उपयुक्त.
मोबाईलवर थेट धान्याचा हिशेब
रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि पारदर्शक सुविधा सुरू झाली आहे. आता रेशन कार्डधारकांच्या मोबाइलवर त्यांना मिळालेल्या धान्याचा हिशेब थेट एसएमएसद्वारे (SMS Alert) मिळण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यामुळे रेशनच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. नोव्हेंबर महिन्यातील धान्य वाटपासंबंधी अनेक लाभार्थ्यांना असे एसएमएस आले आहेत, ज्यामध्ये त्यांना मिळालेल्या धान्याच्या कोटा स्पष्टपणे नमूद केला आहे. या संदेशात ज्वारी, गहू आणि तांदूळ या धान्य प्रकारांचा प्रत्येक लाभार्थ्याला किती किलो वाटा मिळाला आहे, याची माहिती दिली जात आहे.
गैरप्रकार आढळल्यास काय करावे?
मेसेजमध्ये दिलेली माहिती अत्यंत स्पष्ट असून, आदेशानुसार हा कोटा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकारच्या पूर्णपणे निःशुल्क दिला जात आहे. जर तुम्हाला रेशन दुकानात कमी धान्य मिळत असेल किंवा मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोट्यापेक्षा कमी धान्य दिले जात असेल, तर तातडीने तक्रार करणे आवश्यक आहे.
यासाठी:
-
पावती घेणे अनिवार्य: धान्य घेतल्यानंतर दुकानदाराकडून पावती घेणे बंधनकारक असल्याचे संदेशात स्पष्ट केले आहे. पावतीवर दिलेला कोटा तपासा.
-
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक: तक्रारी नोंदवण्यासाठी १८०० २२ ४९ ५० आणि १९६७ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत.
‘मेरा रेशन’ ॲपची उपयुक्तता
जर काही कारणास्तव तुम्हाला एसएमएस प्राप्त झाला नसेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. केंद्र सरकारचे ‘मेरा रेशन’ (Mera Ration) हे ॲप अत्यंत उपयुक्त आहे. या ॲपवर आधार क्रमांक वापरून तुम्हाला मंजूर झालेला धान्याचा कोटा तपासता येतो. मंजूर धान्य आणि प्रत्यक्ष दुकानदाराने दिलेल्या धान्यातील फरक ओळखण्यात हे अँप खूप उपयोगी पडते.
एसएमएससाठी मोबाईल नंबर जोडणे अनिवार्य
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि प्रत्येक महिन्याला किती व कोणते धान्य मिळणार आहे याची माहिती मिळवण्यासाठी, तुमचे मोबाइल क्रमांक रेशन कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे.
काही ठिकाणी चुकीचे एसएमएस येण्याच्या तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात पुरवठा विभागाकडून तपास सुरू आहे. ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे की, चुकीचा मेसेज आल्यास ग्राहकांनी लगेच पुरवठा विभाग किंवा संबंधित दुकानदारांशी संपर्क साधावा. सध्या प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचे (अपडेशन) काम सुरू असल्याने ही समस्या येत आहे. मात्र, या सुविधेमुळे गैरप्रकारांना निश्चितच आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.